आपल्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यास आपण त्या
आपल्या मुलांच्या आयुष्यात पूर्ण करायची स्वप्न रंगवू लागतो. योग्य तेवढे चांगले
शिक्षण, आर्थिक दर्जा उंचावणे, आपल्याला जे स्वतंत्र मिळालेलं नाही ते मुलांना
मिळावे अशा अनेक प्रकारच्या इच्छा असतात. ज्या मनुष्य काही कारणास्तव पूर्ण करू
शकत नसतो. परंतु एक योग्य वेळ त्याच्या ह्या सर्व इच्छा त्याच्या मुलांच्या
आयुष्यातून नक्कीच पूर्ण करते. असंच काहीसा माझ्या मम्मीचा दृष्टीकोन तिच्या
आयुष्याकडे बघण्याचा होता, तो तिने साफल्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तिने जे
सुख उपभोगले नाही ते सुख तिच्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला. अगदी तिच्या बालपणापासून
ते आजच्या दिवसापर्यंत.
घरात थोरली असल्यामुळे भाऊ बहीण यांच्या इच्छांना
जास्त प्राधान्य मिळत असे, पण त्यात ती नेहमीच खुश असे. मोठ्या बहिणीची जबाबदारी
ती जोमाने पार पाडत असे. भावंडांचा सांभाळ करण्यापासून ते शिकवण्या घेईपर्यंत
त्यांची सगळीच जबाबदारी तिला पार पाडता येत होती. आई वडील रानात दिवसभर घाम गाळत
असत. ते घरी पोहचण्या अगोदर शाळेतून हि घरी पोहचत. आईच्या पुढे येऊन स्वयंपाकाला
सुरवात झालीच पाहिजे. मुलींचं आयुष्य हे जबाबदाऱ्या सांभाळनेच असत, अशा प्रकारच्या
शिकवणीने ती हा भार अगदी सहज रित्या पेलत असे. त्याचबरोबर आई वडील शेतकरी असल्यामुळे
शिक्षण दहावी पर्यंतच घेऊ शकली, पण तेही त्याकाळात पुरे झाल. तरीदेखील तिची पुढे
शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण दहावीचा निकाल लागण्या अगोदरच लग्न झाल.
खेडेगावातील शाळेचे गणवेश किंवा घरात
देखील घालायचे कपडे हे मुलींचे शर्ट आणि परकर त्यामुळे छान-छान सुंदर-सुंदर फ्रॉक
म्हणा किंवा लहान मुलांना शोभतील असे कपडे वापरण्याचे दिवस फारच कमी होते. त्यातही
परिस्थिती एवढी काही उच्च स्तराची नसल्यामुळे शहरी पेहराव मिळणे म्हणजे अवघडच. जे
आहे त्यातच तिला फारच आनंदी राहता येत होते, अगदी लहानपणापासून, त्यामुळे तिला
सासर घरी हे सगळ सोसतांना किंवा आपल्या इच्छांना बाजूला ठेऊन दुसऱ्याचे मन कसे
राखता येईल हे उत्तम रित्या तिला जमले. लग्न होताच ती मुलीचे(बाळाचे) स्वप्न पाहू
लागली, तिने मनाशी निश्चय केलेला होता, जे-जे मला आयुष्यात मिळाले नाही ते-ते मी
माझ्या मुलींसाठी करणार, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी मिळवणारच. अशी काही तिने
मनाशी जणू काही गाठच बांधून घेतली. संसार करत असतांना तिला स्वतःचा विसर पडत गेला,
तिच्या सगळ्याच गोष्टींवर बंधन आली. पप्पा तेव्हा विध्यार्थी असल्यमुळे त्यांच्या नोकरीला
अजून बरेच वर्षे होते. त्या अगोदरच माझा जन्म. सगळ काही आयुष्य सुखात सुरु असल्याचा
भास ती घेत होती. परंतु तिने तिच्या बाळासाठी पाहिलेल्या स्वप्नांवर हि आता बंधने
येऊ लागली. तिला बऱ्याचशा चैनीच्या गोष्टी मुलीसाठी करता येत नव्हत्या. तिच्या
मनाची घाळमेळ होऊ लागली. मुलगी चार वर्षांची होई पर्यंत किती तरी इच्छा अपेक्षांचे
माती मोल झाले होते. आता आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय तिच्या पुढे येऊन ठेपला तो
म्हणजे मुलीचे शिक्षण चांगल्या शाळेत व्हावे यासाठी तिची धडपड सुरु झाली, परंतु
दोघ नवरा बायको मुलीसाहित स्वतःच्या पायावर उभे नसल्यामुळे तिला तिच्या स्वप्नाच्या
जगात ठेस लागून सत्याच्या जगात जड अंतकरणाने पाऊल ठेवावे लागले. तीही गोष्ट तिने
हसत हसत स्वीकारली. पण त्या चार वर्षात ती नवऱ्याची ताकत बनून संसार करीत राहिली. ती
कधीही डगमगली नाही. बाकी सासर घरातून तिने कधी कोणतीच अपेक्षा केली नाही, ज्या
अपेक्षांची पुरती होणे अवघड असते त्या न केलेल्याच बऱ्या..., हा स्वतःचा विचार
तिने सामंज्यस्याने केला असल्यामुळे तिला ह्या गोष्टी स्वीकारणे फार काही अवघड
गेले नाही.
दुसरी
मुलगी झाली तेव्हा तिचे स्वप्न पुन्हा फुलू लागले. ती पुन्हा तिच्या जगात हरवू
लागली पण ह्या वेळेस नियतीला सुद्धा तिच्या स्वप्नांपुढे झुकावे लागले. तेव्हा
नवऱ्याचे शिक्षण पूर्ण होऊन पोलीस ऑफिसर ची पदवी मिळाली. दोघींचे संगोपन अगदी
लाडखोडा सुरु केले. आणि जी स्वप्न पहिल्या मुलीच्या वेळेस देखील पूर्ण झाली नाही
ती स्वप्न तिने दुसऱ्या मुलीच्या वेळेस पूर्ण केली. आणि ह्याच आनंदाच्या भरात आणखी
तिसर बाळ झाल. माझ्या मम्मी-पप्पांना मुली जेवढ्या प्रेमळ आणि आवडीच्या तेवढाच
त्यांचा तीसरा मुलगा देखील. त्यांनी कधीही मुलगा-मुलगी यात दुजाभाव केला नाही. आता
पुन्हा मुलांच्या संगोपनात ती इतकी वाहून गेली कि तिची मुल आणि नवराच तीच आयुष्य
राहिले ती न कधी माहेरी जाण्याचे हट्ट करीत असे न कधी कुठे फिरायचे हट्ट केले. तिने
कधीच नवऱ्याकडे शब्दानेहि अपेक्षा व्यक्त केली नाही. न साड्या, न दागिने, न कुठला
श्रींगार अगदी साधी राहणीमान ठेवली. परंतु ती आता मुलींचे सगळ्याच प्रकारचे लाड
पुरवू लागली. कपडा-लत्ता, शिक्षण, चांगल्या-चांगल्या प्रकारचे खाद्य पदार्थ ती
घरीच बनवू लागली. तिची कधीच कोणतीच तक्रार नसल्यामुळे नवऱ्यालाही कधी कळाले नाही,
कि बायकोच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्यात आणि कोणत्या राहिल्यात? त्यानेही कधी
जाचाने हे पहिले नाही, ‘चाललाय संसार, सुखात चाललाय’.... प्रेमावरच सगळ काही भागवणे
हाही एक प्रकारचा स्वतःच्या इच्छा-अपेक्षांवर केलेला अन्यायच असतो, हे तिने कधीच
मान्य केले नाही.
पण, त्यात एका स्त्री च अस्तित्व हे
संपूर्ण पणे हरवलेले होते. तिने तिचे कर्तव्य खूपच मनापासून पूर्ण केले तिच्या
वयाच्या प्रयेक टप्यावर ती एक चांगली मुलगी, बायको, सून, आणि आई तसेच घरातील सगळेच
नाती तिने फारच प्रेमाने आणि जबाबदारीने सांभाळले. पण..., तीच आयुष्य जगायचं ती
विसरलीच. कधी त्याची जाणीव जरी झाली तरी दोन मुलींमध्ये तिने तिच्या बऱ्याच इच्छा
पूर्ण केल्या असल्यामुळे ती खूप समाधानी होते. तिच्या कपड्यांची, शिक्षणाची, उच्च
दर्ज्याच्या राहिमानाची, दागिन्यांची, स्वप्नांची सगळ्याच प्रकार ची हौस तिने
खबरदारीने मुलींसाठी पूर्ण केली. आणि त्यांना सर्व काही वेळेवर पुरवत गेली. तिच्या
ह्या समाधानी स्वभावामुळेच तिच्या नवऱ्याला तिच्या साठी जास्त काही कष्ट कधी करावे
लागले नाही. भावनिक क्षण आयुष्यात किती वेळा त्रास दायक ठरतात, पण अशा वेळेसहि ती
न डगमगता जोमाने उभी राहत आली. तिला न मिळालेल्या स्वातंत्र्याची खंत तिला आता
अजिबातच वाटत नाही, कारण तिच्या मुली अगदी स्वतंत्र पणे शिक्षित झाल्या, त्या
स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागल्या, मी माझा लग्नाचा निर्णय स्वतः घेतला. हे सगळ
त्या माऊली मुळेच घडले. तिची शक्ती म्हणजे आम्ही दोघी बहिणी आहोत.
तिची
वाढदिवसाची तारीख तिला माहित नव्हती, पण आम्हाला जेव्हा कळू लागले तेव्हा आम्ही
तिला विचारल्यावर ती म्हणाली तारीख तर माहित नाही पण नागपंचमी च्या दिवशी माझा
जन्म आहे. तेव्हापासून आम्ही नागपंचमी जेव्हा असेल त्याच दिवशी तिचा वाढदिवस साजरा
करतो. तीही एक मज्जा म्हणून आम्हाला साथ देते. म्हणूनच मला अस वाटत, आयुष्य जर
फक्त स्वतःसाठी जगलो तर आपण काही अंशी आनंदी राहू शकतो परंतु, सगळ्यांसाठी जगतांना
त्या सर्वांच्या आयुष्याचे अनुभव आपल्या आयुष्याला लागू होतात. आणि त्यामुळेच ती
घरातल्या प्रेत्येक मनुष्याच आयुष्य जगली आहे. प्रत्येकाच्या अनुभवाची शिदोरी
तिच्याकडे आहे. जी आपल्या कुणाकडे नसते. कारण आपल्याकडे फक्त आपलेच अनुभव आहेत. अशी
खूप कमी माणसे असतात जी दुसऱ्यासाठी जगत आलेली असतात. त्यातलीच ती एक, त्यामुळे
तिला कधी प्रश्न पडलाच नाही, कि माझ अस्तित्व नक्की काय आहे.......
तीच अस्तित्व आज तिच्या मुलीच आहेत. कारण
तीने त्यांच्यातच स्वतःला पाहीले. तीच स्वतःच आयुष्य ती आमच्यात जगत आली.
असे आहे “तिचे अस्तित्व”.....!
आयुष्यात वाढदिवसाची तारीख असणे महत्वाचे नाही, आपले
रोजच विचारांनी, भावनांनी, वयाने, ज्ञानाने, प्रगतीने आयुष्य हे वाढतच असते.
तरीही मम्मी तुला
ह्या सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा....!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा