मंगळसूत्र....!
विवाह बंधन म्हंटल कि
आपल्या डोळ्यासमोर मंगळसूत्र हा दागिना येतो. एकमेकांना नाजूक धाग्यात बांधले हे
या मंगळसूत्रा वरून सिद्ध होते. बऱ्याच वर्षांपासून भारतीय संस्कृती मध्ये हि रूढी
परंपरा चालू आहे. मंगळसूत्राची महती बऱ्याच स्त्रियांनी अजूनही खुप छान प्रकारे
जपून ठेवलीय. आज बऱ्याच मुली मंगळसूत्र या दागिन्याला “लायसन्स” या नावाने
संबोधतात. पण तरी त्या याचा द्वेष करीत नाहीत. आवडीने हव्या त्या डिझाईन हल्लीच्या
स्त्रिया बनवून घेतात. अगदी संपूर्ण सोळा शृंगार करून देखील जे सौंदर्य खुलत नाही ते ह्या
मंगळसूत्राने खुलवले जाते. स्त्री सौंदर्यात जी भर पडते ती वाखाणण्या जोगी असते.
भारतीय संस्कृती
मध्ये प्रत्येक राज्यात मंगळसूत्राला वेगवेगळी नावे आहेत. त्यातील महाराष्ट्र आणि
कर्नाटक मध्ये मंगळसूत्र हा प्रचलित असा दागिना आहे. कर्नाटकात मंगळसूत्राला “ताळी”
असे म्हणतात. आपल्या ग्रामीण भागात गाठलं, डोरलं, गुंठन असे म्हणतात. काळे मनी
मध्ये दोन सोन्याच्या वाट्या चार मनी अशी याची साधारण ओळख आहे. पण हीच साधारण ओळख
स्त्री साठी तिचे “स्त्री धन” असते. लग्न ठरल्याबरोबर सर्वात आधी दागिने घेण्याची
सुरवात हि मंगळसूत्रा पासूनच होते. वधुलाही त्याचे वेध लागतात. मग डिझाईन पसंती
पासून ते किती तोळ्याचे करायचे इथ पर्यंत विचार सुरु होतात. आमच्या ह्यांनी मला
सहज हसता-हसता विचारले होते तुला किती तोळ्याच मंगळसूत्र हवय, नाही म्हणजे तो काही
लगेचच तसच करणार अशातला काही भाग नाही बर का...! फक्त एक मत जाणून घ्यायचं होत
त्याला माझ. मी तुझ्या पेक्षा हुशार.. म्हणूनच मीही म्हंटल करा तुमच्या शिक्षण आणि
हुद्द्या प्रमाणे. म्हणजे त्याबद्दल मला कुणाला सविस्तर सांगायला नको. मनापासून
हसला हो.... नाही हो... “काळे मनी आणि दोन सोन्याच्या वाट्या” केल्या तरी चालेल हं
मला..!, मग तर अजूनच मन मोकळ झाल बिच्याऱ्याच... हुश्श्...सुटलो...!!!
भारी गम्मत आली होती त्याची.
पण तरी कोण जाणे काही स्त्रिया नवीन मुलींना इतक्या टोचून टाचून बोलत
असतात. काहीतरी वावग बोल्याशिवाय त्यांना जमतच नाही, किंवा त्या वयाने मोठ्या
आहेत, अनुभवाने मोठ्या आहेत हे त्या दर्शवण्याचा प्रयत्न करतात त्यांची हि मत
व्यक्त करण्याची पद्धत आहे. आजकालच्या नवीन मुलींना शिस्त नाही, त्या संस्कृती जपत
नाही, त्यांना दागिन्यांच ओझ होत, दागिने म्हणजे बेड्या वाटतात... अस खूप खूप खूप काही
बोलत असतात. त्यांचा नवीन पिढी कडे बघण्याचा दृष्टीकोन येवढा भयंकर झालेला आहे. कि
त्यांना समजावलं तर त्या आपल्या शिक्षणाला आणि सौंदर्याला नाव ठेवतात. ह्या
शिकल्या म्हणजे लै मोठ्या झाल्या यांना लै अक्कल आली. अस काय-काय बोलतील. असे अनेक
काही अनुभव आपल्या मुलींना येतात.... मलाही एक अनुभव आला.. तो म्हणजे जपान आणि
भारताच्या वेळेत ३.३० तासांचे अंतर असल्यामुळे भारतात गेल्यानंतर लांबचा प्रवास, शारिक
थकवा, उलट्या, डोके दुखणे, अजून काही शारीरिक दुखणे जाणवतात. तरी मी सकाळी लवकर
उठून अंघोळ करून साडी नेसली आणि घरातल्या मोठ्या माणसाकडे मी नेहमी माझे दागिने ठेवायला
देत असते त्यातल मंगळसूत्र मागितल.. देता देता... आता आधी तू दुध, चहा तुला काय हव
त्याबरोबर गोळी घे बरं.. म्हणजे, तुला लवकर बर वाटेल.. मीही मान डोलावली... एका
हातात पाण्याचा ग्लास, टॉवेलने केस बांधलेले, गुलाबी साडी, आता गोळी
खाणार तेव्हड्यात बाहेरून खिडकीतून आवाज आला.. ए पोरी ती पोत घाल आधी, त्याच्या
आधी पाणी कसं पिती..?, बाई...! म्हंटल.. आता काय बोलू मी ह्या बाईला?, तिच्याकड पाहिलं.! पाण्याच्या
ग्लासामध्ये पाहिलं.! आणि समोरच्या मोरीत तसाच ग्लास फिरकवला. खिडकीतल्या त्या तोंडावर
फिरकवायची इच्छा होती पण, रागा पुढे संस्कार मोठे ठरत आलेत ना...! काय ग बाई काय
झाल? कचरा होता पाण्यात? हाआ.. कचरा होता. पाणी तर चांगल भारलेल. जाऊदे ग्लास खराब
आसल.. मीही म्हंटल हा बहुतेक...
आता खरच मोठ्ठा प्रश्न
मला असा पडला होता कि त्या बाईला उत्तर कस देऊ? ती तर गेली बोंबलत. घरातले काही
बोलत नाही पण, ह्या अख्या गावातल्या बायकांना ह्याच त्याच जास्त उरकत असत. कोणी
काय घातलय कोणी काय नाही घातलय. सादा ड्रेस, जीन्स जरी चुकून गावात घातला तर त्यांना
बाई भोंगळी असल्यासारखंच वाटत. नाही म्हणजे मी नाही म्हणत कि उद्धट पणे अस काही
घालावच, पण त्यांच्या बोलण्याचा सांगण्याचा दृष्टीकोन आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे
त्याच कारण त्यांच्याकडे असाव, आणि मगच कुठल्याही गोष्टीला विरोध करावा. मला सगळे
दागिने आणि साड्या घालायला आवडतात त्यामुळे मला याचा फारसा त्रास होत नाही. मी
आवडीने या सगळ्यात वावरू शकते. पण ज्या मुलींना नाही आवडत त्या फार अवघडतात हो...,
आता ती बाई मला जे बोलून गेली होती त्यात खरच काही तथ्य नव्हते. त्यामुळे मी
तिच्यावर डाफरण्या जोगेच होते. “पाणी पिण्या आधी, गळ्यात पोत घातलीच पाहिजे” याच
काहीतरी कारण तिने मला सांगायला हव.. उगाच समाजात चुकीच्या गोष्टींमधून चुकीचा
विरोध करणे याला काहीएक अर्थ नाही. आपण मूर्ख ढोबळ पद्धतीने जे दिवस काढले ते
आपल्या सुना, मुली, नाती, याहीपेक्षा गावातल्या बाकीच्या स्त्रीयांना काढायला
लावायचे का?.....
नवीन मुलींनाहि आपली
संस्कृती जपायला फार आवडते त्या वेगवेगळ्या जुन्या डीझाइनचे दागिने अगदी बनवून
घेतात. हल्ली जुनीच फॅशन जास्त प्रचलित आहे. फक्त एवढच कि त्या त्यांच्या
साडी, ड्रेस, जीन्स कोणत्याही कपड्याला शोभतील अशा पद्धतीने त्या घालतात. जसे काठापदराची
साडी असली तर मोठ्ठ मंगळसूत्र, टीकल्यामण्यांची खड्यांची असेल तर, खड्यांचे आणि
नाजूक मंगळसूत्र, अजून अनेक अनेक प्रकार आहेत. काही पेहरावावर मंगळसूत्र नाही आवडत
त्यांना घालायला, मग याचा अर्थ असा नाही होत कि त्या बेशिस्त आहेत. त्यांनी लाज
सोडली, पोत गळ्यात नसेल तर पाणीही पिऊ नये.. हाह्हाहा.. मी तर माझ्या नवऱ्याच्या नावाच मंगळसूत्र आणि
आमच्या दोघांच्या नावाचे बाहुले असणारी एक चैन बनवून घेतली. म्हणून काय आता आम्ही
नवीन मुलींनी म्हणायचं कि, जुन्या बायका कोणाच्या नावाच मंगळसूत्र घालतात काय माहित
सगळ्याचं सारखच असत,.... आम्ही नवीन मुली तर नवऱ्याच नावच मंगळसूत्र गळ्यात
घालतो... नाही ना...?, अस नाही म्हणू शकत आपण.. चुकीच आहे ते.. मग ह्या जुन्या
बायकांनी का चुकीच्या गोष्टी बोलाव्यात...
अजून काय-काय ढोंगी चालीरीती रूढीपरंपरा आहेत. त्या ह्या जुन्या बायकांनाच
माहित. ह्या सगळ्या काही चालीरिती त्यांनी स्वतःहूनच बनवल्या स्वतःहूनच दागिन्यांना
बेड्या बनवल. आणि हा सगळा प्रकार फक्त मंगळसूत्रा बद्दलच नाही तर बांगड्या, जोडवी,
पैंजण, टिकली अगदी सगळ्याच दागिन्यांन बद्द्ल आहे. त्यांची भयंकर मत देखील आहेत
त्यावर. तर स्वतःलाच बंधनात अडकवनाऱ्या स्त्रियांना मनापासून सांगणे आहे. नवीन
पिढीत तुमच्या लेकी, सुना, नाती, समस्त स्त्री वर्ग आहे. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे
सजू द्या, नटू द्या शेवटी एकच गोष्ट आहे. याने स्त्रीच सौंदर्य खुलत असत. ते
त्यांच्या मनाप्रमाणे खुलू द्याव आणि तुमच्या आधाराने ती अजून अजून वाढत राहील. कुण्याही
स्त्रीला हे दागिने घातलेच पाहिजे ते दागिने घातलेच पाहिजे अशी जोरजबरद्स्ती करू
नये. मन मारून संस्कृती किंवा संस्कार पाळणे किती योग्य आहे? याचा विचार करून स्त्री
सौंदर्याला बंधनात अडकवू नये..... आणि हो कपडे कसे घालावे हे आजूबाजूच्या परिसरावर
आणि वावरणाऱ्या लोकांवर असत त्यामुळे ते आपण मुलींनी थोडफार जपून कराव.
सौंदर्य स्वतंत्रपणे खूलू द्याव.... त्यामुळे येणार तेजस्वी रूप प्रखर
असेल....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा