संकल्प.....!
image from internet
शाळेत असतांना संकल्प
म्हणजे कोणते तर लवकर निजे लवकर उठे, लवकर उठून ध्यान करणार, खूप खूप अभ्यास
करणार, खूप वाचन वाढवणार, केलेल्या वेळापत्रकानुसार दैनंदिन नियोजन काटेकोरपणे पाळणार,
रोजनिशी लिहिणार, तेब्बेतीकडे लक्ष देणार, ह्या वर्षी सगळ्या वर्षापेक्षा सर्वोत्तम
शालेय गुण मिळवणार.... असे अनेक अनेक अनेक संकल्प असायचे पण चार पाच वर्ष फक्त
संकल्प करण्यातच निघून गेले.
आणि मग, काही वर्षाने
लक्षात आले अस काही नसत ह्या जगात...! ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत ज्या
आपल्याकडून पाळल्या जात नाहीत. एवढ्या सकाळी कोण उठत का कधी?, एवढा अभ्यास फक्त
हुशार मुल करत असतात, दैनंदिन नियोजन हे तर उगवणारा दिवस किती वाजता उगवतोय त्यावर
ठरेल ना?, रोजनिशी काय लिहायची रोज मरे त्याला कोण रडे?, तब्बेत काय?... आहेत
मम्मी पप्पा ते देताय ना लक्ष?, बाकी शालेय गुणांचा आलेख मात्र एकएक गुणाने का
होईना वाढता होता. तो कधी खाली नाही आला. याच समाधान खात्रीशीर होत, बाकी सर्वोत्तम
गुण वगैरे पाहू हळूहळू.
तर सांगायचा उद्देश शालेय
जीवनात कुठलेही संकल्प पूर्ण होत नव्हते. काही चार दिवस, काही महिना-पंधरा दिवसातच..
पुढे पाठ तर नाही, पण मागे सपाट मात्र होऊन जात होत. परंतु, जसे कॉलेज जीवनात
पदार्पण केल तेव्हा पासून मला काही गोष्टींची जाणीव मोठ्या प्रकर्षाने होऊ लागली. त्याच
कारण मी दहावीच्या सुट्ट्यांमध्ये “बिग मिस” यांच्याकडे शिकवण्या घेण्याच काम केल.
त्यांच्याकडे “इंग्लिश मिडीयम, ची प्ले ग्रुप पासुन ते आठवी नववी पर्यंतची मुल
शिकत असत”. माझ्याकडे दोन ब्याच, “सिनियर केजी” ची मुल होती. आणि मी मराठी मिडीयम
ची असल्यामुळे इंग्लिश मिडीयम च्या मुलांचे मराठी हिंदी विषयांचे सातवी, आठवी,
नववी च्या विध्यार्थ्यांचे पाठांतर घ्यायचे. इंग्लिश मिडीयम चे मराठी आपल्या मराठी
मिडीयमसाठी सोप्प असल्यामुळे त्यांना प्रश्न देऊन उत्तर पत्रिका लिहून घ्यायच्या हे
माझ काम.
कॉलेज सुरु होऊन देखील मला
ते काम सोडावस वाटल नाही, दोन्ही सांभाळून मी खूप खुश राहायचे. फक्त माझ्या परीक्षांच्या
वेळेस “बिग मिस” मला हव्या तेव्हढ्या सुट्या द्यायच्या. आणि मला त्यांचा हाच
स्वभाव फार आवडत असे. त्यांच बोलण, शिकवण, वय वर्षे ७५ च्या पुढील असतांना देखील सकाळी
नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ नऊ पर्यंत सतत काम चालू राहणे हे मला फार
प्रोत्साहन देत असायचं. प्रत्येक वर्गासाठी माझ्यासारख्या मुली त्यांनी मुलांना
शिकवायला ठेवलेल्या होत्या. पण प्रत्येक वर्गावर त्या स्वतः जाचाने लक्ष देत असे. जवळजवळ
एक एका वर्गात २०,२५ मुल असायचे. एकंदरीत त्या शाळाच चालवत होत्या. माझी ओळख
त्यांच्यासोबत माझे भावंड “प्ले ग्रुप” ला असल्यापासून होती मी त्यांना आणायला
सोडवायला जात असे. “बिग मिस” नेहमी माझ्या अभ्यासाची देखील चौकशी करत असे. त्यांनाही
मी फार आवडायचे. माझ्या भावंडाना मी फार जीव लावते, हे त्या आवर्जून मम्मीला सांगत
असे. अशा प्रकारे मी दोन वर्षे तिथे काम केले. आणि ह्याच दोन वर्षात मी बरच काही
शिकले. कारण शिक्षक हा असा पेशा आहे ज्यात विद्यार्थांना शिकवता शिकवता शिक्षक
स्वतःच बरच काही शिकत असतो. शिक्षकाकडे सगळ्याच विषयांच किंवा गोष्टींच शिक्षण
असेल असे नाही. खर तर तो विद्यार्थ्यांकडून पुढील शिक्षण घेत असतो. आणि हाच अनुभव
मी स्वतः घेतला.
कॉलेज ची वर्षे हि “गोल्डन
इयर्स” म्हणून संबोधली जातात. आणि माझ्या त्या सोनेरी वर्षानां सुरवात झालेली होती.
माझ्या प्रगतीचा आलेख
मी कधी खाली येऊ दिला नाही. उंचावर किती जाईल याचीची कधी काळजी केली नाही, पण
मात्र तो खाली येऊ द्यायचा नाही हे ध्येय मी गाठू लागले आणि त्यासाठी मी संकल्प
पूर्ण करायला शिकले. पुढील वर्षात आपल्या आयुष्यात काही बदल होण गरजेच आहे. ते
कोणते हे ओळखून त्यानुसार संकल्प करत गेले. त्यात मी स्वतःला कधीही त्रास होईल किंवा
ओझ होईल असे काही केले नाही. जे जमेल ते आनंदात करायचं आणि अगदीच नाही जमल तर ते
पुढील वर्षात नक्की पूर्ण करायचं. दर वर्षी ह्या सूत्राला धरून चालले.
मी काही फार मोठी
डिग्री घेतली नाही, फार मोठी नोकरी मिळवली नाही, पैसा तर माझ्याकडे फार कष्टाने
जमा होत असे. पण सगळ काही वेळेवर आणि अगदी छोट्या, सुंदर, गोड स्वरुपात मिळत गेल. त्यात
माझ समाधानी असण हे फार मोलाच ठरत गेल. त्यामुळेच मला पुढील संकल्प पूर्ण करण्याची
ताकत मिळत गेली. लग्नानंतर काही टक्के संकल्प मागे पुढे झाले. पण काय करणार नवरा भवऱ्या
सारखा असतो कोणत्या बाजूला लुडकल काही भरवसा नाही. आणि आपण त्या भवऱ्यावर अवलंबून,
मग आपलीही अवस्था थोडीफार तशीच होणार ना?...., पण तीहि त्याच्या प्रेमाने सावरून
गेली आणि मग काय आता माझ्यासारखे संकल्प करायला तोही शिकला.
‘ह्या वर्षी मी तुला
शॉपिंग ला नाही म्हणत जाणार’, असा संकल्प त्याने केला. काय परवडा आहे बाई... “शिंदे
बाबा”....! “संकल्प” हा नेहमी सकारात्मक असावा. समजल का...? हाच हाच हाच फरक
तुमच्या सारख्या लोकांना समजत नाही.
संकल्प काय असतात?, कसे करायचे?, पूर्ण कसे
करायचे?, बऱ्याच लोकांना असे काही प्रश्न पडलेले असतात. काही लोक तर ह्या विषयात अजिबात
रस घेत नाहीत. आणि काहींनी घेतला तर हल्ली काही जेमतेम प्रकारचे संकल्प असतात. एक
तर वजन कमी करणे, डायट करणे, योगा-जिम करणे, फार फार तर वाचन करणे. असे मोजकेच
बोटावर मोजण्यासारखे संकल्प लोकांना माहित आहेत. पण खर तर तसे अजिबात नसते.
संकल्प हे स्वतःला जोरजबरदस्तीने
एखाद काम किंवा बदल करायला भाग पाडणे हे नसून एक प्रकारच स्वच्छंदी
आयुष्य जगणे, नवीन प्रकारच्या गोष्टी शिकणे, केलेले संकल्प योग्य रीतीने म्हणजेच
ताण तणाव न घेता सुरळीत चालू ठेवणे. योग्य त्या गरजेच्या विषयांच नियोजन करणे. आयुष्याच्या
कुठल्या वळणावर, कुठल्या वेळेला, कुठले आणि कसे निर्णय घ्यायचे हे समजून घेणे. मुख्य
म्हणजे काही गोष्टी अशा असतात ज्या आयुष्यात त्या-त्या वयात किंवा त्या-त्या
वेळेला त्या मिळवणे गरजेचे असते. त्यासाठी आपण किती मेहनत घेतो याचा हेका लेखा
ठेवणे फार गरजेचे असते. “सब गाणे बजेंगे” अस म्हणण फार सोप्प असत पर भाई वह टाईम पे
नही बजेंगे तो उसका मजा किरकिरा हो जाता है.....I त्यामुळे दरवर्षाला आयुष्याशी
निगडीत असे संकल्प जरूर करावेत. आयुष्य सुखकर होण्यास मोलाची भर पडत जाते.
माझे दरवर्षाप्रमाणे
ह्याही वर्षी बरेचशे संकल्प पूर्ण झाले बरेचशे म्हणजे ९५% टक्यांना जास्त, आणि जे
पूर्ण नाही झाले ते पुढच्या वर्षी नक्कीच होतील. याची मला शाश्वती आहे. पूर्ण न
होणाऱ्या संकल्पांच दु:ख अजिबात वाटल नाही. खर तर काही राहून गेल अस जाणवल सुद्धा
नाही. कारण मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच बंधन लादल नव्हत. आणि ते भविष्यासाठी
फारसे अडथळे निर्माण करणारे देखील नाहीत. त्यामुळे आज वर्षाचा शेवट आणि सुरवात दोन्हीहि
अगदी आनंदी आणि सुखकर झाले.
प्रत्येक शेवट, हा नवी
सुरवात असते.
राजश्री जगताप....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा